एक भाकर तीन चुली...
पारूबाई या अनाथांची माय सिंधुताई सपकाळच आहेत की काय असाच क्षणभर भास होतो ही कादंबरी वाचताना... भरउन्हात खळ्यावर जन्माला आलेली अभागी पारूबाई आणि रात्रीच्या काळोखात चिमणीचा उजेडही सोबतीला नसताना जन्माला आलेला बबू यांचा जीवनपट मनाला स्पर्शून जातो.आणि मनात घर करतो. जन्म जिथे झाला ते खळं आणि आयुष्यभर कामं केलेली शेतं, नाला - बंडिगची कामं,ताली,रानं,यांनी पारूबाईची साथ कधी सोडलीच नाही. जीवनातील सर्व संकंट,रागराग,द्वेष,गरीबी,दुबळवाडी, भाऊबंदकी,पुरूषांच्या वखवखलेल्या नजरा,सासू - नणंदाचा छळ सहन करूनही पारूबाई कधीही जीवनाला वैतागत नाहीत. संकटांना पायाखाली घेऊन ,संकटाच्या छाताडावर उभं राहून पारूबाई स्वाभिमानानं जगतच राहातात. जीवनात हारत नाही. संकटांनी कधीही गर्भगळित होत नाहीत. ही कादंबरी वाचणारा वाचक जीवनातील संकटांना कधीच घाबरणार नाही. त्याच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार कधीही येणार नाही. स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रत्येकात ओढ निर्माण होईन. ...